Thursday, February 28, 2013

मनुष्यवस्तीलायक नवीन ग्रह - काय वाटेल ते!


समजा मानवजातीला वास्तव्य करण्यायोग्य नवीन ग्रह सापडला तर? ह्यात काही गोष्टींचा विचार करावा लागेल.
१> पृथ्वीपासून त्या ग्रहाचे प्रकाशवर्षे अंतर. समजा तो ग्रह २० - ३० प्रकाशवर्षे अंतरावर आहे (ही शक्यता कमी कारण असे असते तर हा ग्रह आतापर्यंत सापडला असता). तरी सुद्धा २०-३० प्रकाशवर्षे अंतरावरील ग्रहावर पाठवायला लोकांची निवड प्रक्रिया घेण्यात आली असती. कारण यानांची संख्या मर्यादित असेल. आता प्रश्न असा येईल की केवळ आपण बुद्धिमान लोकांचीच निवड करू का? आता ह्या निवडप्रक्रियेचे निकष ठरविणे हा फार संवेदनशील मुद्दा बनू शकतो. राष्ट्र, खंड, धर्म, विविध क्षेत्र ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील माणसे निवडावी लागतील. आणि जरी यानाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी २०-३० वर्षाच्या प्रवासाचा ह्या लोकांवर काय परिणाम होईल? बहुदा आपल्यास १० - २० वर्षे वयोगटातील मुलेच पाठवावी लागतील. त्यांना त्यांच्या प्रवासात शिक्षणाची सोय करून द्यावी लागेल. माझ्या मते १ -२ वर्षांच्या फरकाने अशी अनेक याने पाठवावी लागतील आणि मध्ये अंतराळ स्थानके उभारावी लागतील. जिथे हे प्रवासी लोक विश्रांती घेतील.
२> हा नवीन ग्रह किती मोठा असेल? बहुदा पृथ्वीच्या १० -२० पट मोठा असलेला बरा! मग तिथल्या मालमत्तेचे वाटप कसे होईल? नक्कीच जे पहिले प्रवासी जातील त्यांना आपल्या मालकीहक्काच्या जागेवर खांब ठोकण्यास परवानगी असावी. जर अशी निवडप्रक्रियेसाठी जाहिरात आली तर त्यात सहभागी व्हायची माझी मनोमन इच्छा असेल. परंतु माझा मुलगा तिथे आला नाही तर? मग तिथल्या मालमत्तेचा वारसाहक्क कोणाला?
३> त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या कितीपट असेल हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथले हवामान कसे असावे? आपल्याकडे पर्याय असेल तर कॅलिफोर्नियाच्या हवामानासारखे असावे. तिथे सर्व क्षेत्रातील माणसे न्यावी लागतील, रस्ते बांधावे लागतील, शेती करावी लागेल, इस्पितळे लागतील आणि शाळासुद्धा उभाराव्या लागतील. परंतु ह्या सर्व क्षेत्रातील ज्ञान जसेच्या तसे अमलात आणता येणार नाही, तिथले भौतिक / रसायन / स्थापत्य / जीव / वैद्यकीय क्षेत्रातील नियम आपल्यापेक्षा वेगळे असतील. मग पृथ्वी आणि त्या नवी ग्रहावरील ह्या क्षेत्रातील नियमांची तुलना करणारे नवीन तज्ञ उदयास येतील. तिथे नवीन प्रकारचे संगीत उदयास येईल. त्या ग्रहावरील आणि पृथ्वीवरील संवादासाठी अधिक विकसित इंटरनेट बनवावे लागेल. तिथला पुरुष आणि पृथ्वीवरील स्त्री प्रेमात पडल्यास धमाल येईल! प्रेमभंग झाल्यास गाण्यासाठी 'तेरी दुनिया से हो के मजबूर में चला, में बहुत दूर चला' हे गाणे खूप मागणीत येईल!
४> काही काळाने पृथ्वी आणि त्या ग्रहात क्रीडा सामने सुरु होतील. परंतु गुरुत्वाकर्षण वेगवेगळे असल्याने पाहुणा संघास अडचणी येतील. ह्या ग्रहाचे नाव काय ठेवावे ह्यावर बरीच चर्चा होईल!
५> थोडे दिवसांनी तिथे स्थानिक आणि परग्रहीय असा संघर्ष सुरु होईल. काय सांगावे युद्ध सुद्धा होईल.
असो थांबतो इथे! परंतु ही एकदमच वेडगळ कल्पना म्हणून सोडून देवू नका. येत्या १००-२०० किंवा ५००-१००० वर्षात हे असे काही होणार आहे. आणि त्या साठी तयारी करणे हे अखिल मानवजातीचे कर्तव्य आहे.  

No comments:

Post a Comment